प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२००९/०९/१९

आंतरिक शक्तीचा शोध

.
७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच रहात असे. दरम्यान मला अनुत्तरित प्रश्नांचा विळखाच पडलेला होता. ते प्रश्न मी कसे सोडवले? प्रतिबंधक हृदयोपचाराचा मार्ग मला कसा गवसला? वाटेत कुठकुठल्या अडचणी आल्या? आणि केवळ दोन वर्षांच्या आत मी जवळपास पूर्वपदावर कसा परतलो? ही एक आंतरिक शक्तीच्या शोधाची सुरस कथा आहे. तुम्हालाही ती बोधप्रद होऊ शकेल असा विश्वास वाटून ती लिहून काढली आहे.

समस्येची सुरूवात

शनिवारीच माझ्या पावलांवर सूज आलेली होती. विशेषत: डाव्या. रविवारी वाट पाहिली, यासाठी की काही चावल्याची वगैरे असेल तर सूज उतरेल. पण सूज उतरली नाही. सोमवारी सकाळी जरा वाढलेलीच वाटली. लक्षण काही चांगले नव्हते. तो दिवस होता ४ नोव्हेंबर २००४. मग विचार करून असे ठरवले की डॉक्टरकडे जायलाच हवे. मी आयुवेर्दिक डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतला. कारण आम्ही त्यांना चांगले ओळखत होतो. ११३० वाजता त्यांचा दवाखाना उघत असे. मी त्यासुमारासच तिथे पोहोचलो.

सूज पाहिल्यावर त्यांनी रक्तदाब मोजायचा निर्णय घेतला. तो २३०/१७० भरला. त्यांनी रक्तदाब फारच जास्त असल्याचे सांगून रक्तमोक्षण करावे लागेल असे सांगितले. रक्तमोक्षण म्हणजे १०० ते २०० मिलीलिटर रक्त शीरेतून इंजेक्शनने काढून, टाकून देणे. लगेच सुई, पिचकारी वगैरे आणली व रक्तमोक्षण केले. नंतर रक्तदाब २००/१३० इथपर्यंत उतरला. औषधे दिली. कार्यालयीन तणावामुळे, अतिश्रमामुळे किंवा कसल्यातरी गूढ कारणाने रक्तदाब वाढला असल्याचा माझा समज झाला. पण उपाय तर करायलाच हवा, म्हणून मी विश्रांतीसाठी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी दरदिवसाआड रक्तदाब मोजून घ्यायला जात असे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर व औषधोपचारांनंतर रक्तदाब १४०/१०० असा राहू लागला. कधी कधी १६०/१०० असा वाढलेला ही आढळत असे.

रक्तमोक्षण, बस्ती, काढा, चंद्रकलारस, बेलाची पाने पाण्यात बुडवून ते तीर्थप्राशन, अटेन-५० ह्या ऍलोपॅथीच्या गोळ्या, सुवर्णसूतशेखर वटी, सर्पगंधा घनवटी, नस्य ह्या साऱ्यांचा वापर करूनही सुधारणा होत नव्हती. मला कल्पना होती की, आमच्या कार्यालयीन ऍलोपॅथी उपचारपद्धतीच्या निकषांनुसार हा रक्तदाब खूपच जास्त असून त्याना तो लक्षात आल्यास ते रुग्णालयात दाखल करतील. मात्र आमच्या आयुर्वेदिक वैद्यांचे म्हणणे असे होते की वाढत्या वयानुसार रक्तदाबही वाढत असतो. काही जणांचा रक्तदाब मुळातच जास्तही असू शकतो. त्यामुळे, जर काही इतर त्रास नसेल तर त्यावर आहार, विहार व व्यायामाने उपचार करत राहावे. हळूहळू कमी होईल.

थकवा वाटत नसे. छातीत दुखत नसे. माझी सारी कामे मी पूर्ववतच करत होतो. रक्तदाब मोजण्यासाठी दरदिवसाआड वैद्यांकडे जावे लागत होते. कधीकधी श्वासोच्छवासास थोडा त्रास होत असे (हे आयुर्वेदिक औषधे सुरू केल्यानंतरच सुरू झालेले होते). मात्र अलीकडे, मला लोक बोलत ते ऐकू नये असे वाटे. स्वत:चे बोलणेही नकोसे वाटत असे. चेहरा सुजल्यागत दिसे. मात्र सूज नव्हती.

रुग्णालयात दाखल

३ सप्टेंबर २००४ रोजी ऑफिसच्या नेहमीच्या तपासण्यांच्या दरम्यान रक्तदाब १६८/११० असा भरला. तो 'लक्षणहीन (असिम्प्टोमॅटिक) रक्तदाब' असा निदानित करून रुग्णालयात पाठवण्यात आले. माझ्या ४७ वर्षांच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल होत होतो. यापूर्वीच्या आयुर्वेदिक उपचारांबाबत इथल्या डॉक्टरांचे असे म्हणणे पडले की (पुअर बी.पी. मॅनेजमेंट). ती औषधे चालूच ठेवलीत तरीही काहीच फरक पडणार नाही. मी म्हटले की जी औषधे चालूच ठेवूनही काहीच फरक पडणार नसेल तर ती औषधेच कसली? मी ती आयुर्वेदिक औषधे तात्काळ बंद करून, ऍलोपॅथीचीच औषधे यापुढे घेण्याचा निर्णय घेतला. दुसरे दवशी रक्तदाबनियंत्रणासाठी रोज सकाळी एक याप्रमाणे ऍम्लोडेपिनची ५ मिलिग्रॅमची गोळी घेण्यास सांगण्यात आले. शिवाय चार आठवड्यांनंतर ताणचाचणी करवून घेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयातून सुटतांना 'त्वरित (ऍक्सिलरेटेड) रक्तदाब' असल्याचे नोंदविण्यात आले.

रुग्णालयात निरिक्षणासाठी दाखल असतांना लिपिड रुपरेषेसाठी रक्ततपासणी करण्यात आली. तिची निरिक्षणे उपलब्ध नाहीत. सततच्या उच्च रक्तदाबामुळे बुबुळे कायमची विकृत झाली आहेत का हे पाहण्यासाठी 'फन्डुस्कोपी' करण्यात आली, म्हणजे डोळ्यात वेगळाच लाल प्रकाश टाकून डोळे निरखतात. ह्या तपासणीत बुबुळांवर काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले. सततच्या उच्च रक्तदाबामुळे फुफ्फुसांवर विपरित परिणाम झाला आहे किंवा काय हे पाहण्यासाठी छातीचे क्ष-किरण प्रकाशचित्र काढण्यात आले. इथेही काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले.

ताणचाचणीसाठी १ नोव्हेंबर २००४ हा दिवस निर्धारित करण्यात आला. त्या दिवशी चाचणीपूर्वी मोजले असता रक्तदाब १७०/११० असा भरला. तो जास्त असल्याने सॉबिर्ट्रेटची गोळी जिभेखाली ठेवावयास देऊन तासभर झोपवून ठेवले. नंतरही रक्तदाब १६०/१०० इतका राहिल्याने चाचणी होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा निरीक्षणाकरता एक दिवस रुग्णालयात भरती करण्यात आले.

यावेळी अम्लोडेपिनची ५ मिलिग्रॅमची एक गोळी आणखी वाढवून देण्यात आली. तसेच लोर्वास २.५ मिलिग्रॅमची एक गोळी सकाळी घेण्यास सांगण्यात आले. आता यु.एस.जी.के.यु.बी. म्हणजे मूत्रपिंड व मूत्राशयावर सततच्या उच्च रक्तदाबाचा काही विपरित परिणाम झाला आहे का हे पाहण्यासाठी त्यांची श्राव्यातीत लहरींनी चाचणी करण्यास तसेच पुन्हा ६ आठवड्यांनंतर ताणचाचणी करण्यास सांगण्यात आले. ही श्राव्यातीत लहरींनी चाचणी दोन दिवसांनी लगेचच करण्यात आली. इथेही काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले.

ताणचाचणी, हृदयधमनीआलेखन व हृदयधमनीरुंदीकरण शस्त्रक्रिया

आता ताणचाचणीसाठी ४ डिसेंबर २००४ हा दिवस निर्धारित करण्यात आला. त्या दिवशी ताणचाचणी झाली. ती सुरवातीपासूनच सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. ती सहा मिनिटे चालली. आणि हृदयस्पंदनदर मर्यादेबाहेर गेल्याने थांबवण्यात आली. नंतर ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे निदान करण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला.

एखाद्या व्यक्तीने श्रम केले असता हृदयस्पंदनदर वाढत जातो. केलेले श्रम जसजसे वाढत जातात अथवा ते करण्याचा दर जसजसा वाढत जातो तसतसा हृदयस्पंदनदर वाढत जातो. व्यक्तीस शक्यप्राय असणाऱ्या जास्तीतजास्त हृदयस्पंदनदरास अंतिम हृदयस्पंदनदर म्हणतात. अंदाजे अंतिम हृदयस्पंदनदर काढण्याचे एक सोपे समीकरण आहे. २२५ उणा तुमचे वय हा अंतिम हृदयस्पंदनदर असतो. अशा पद्धतीने काढलेल्या हृदयस्पंदनदराच्या ९० टक्के दरापर्यंत पोहोचेस्तोवर ताणचाचणी चालविली जाते. जास्त वेळ स्थितचालन करवून, चालन पट्ट्याचा चढ वाढवून अथवा पट्ट्याच्या फिरण्याचा वेग वाढवून. माझा, अंतिम हृदयस्पंदनदराच्या ९०टक्के हृदयस्पंदनदर (२२५ -४७)X०.९= १६० ठोके प्रतिमिनिट असा होता. तो पोहोचताच चाचणी थांबविण्यात आली.

७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. कलंकहीन पोलादाचा १६ मिलीमिटर लांबीचा व २.२५ मिलिमिटर व्यासाचा, औषधवेष्टीत विस्फारकही बसविण्यात आला.

हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रियेनंतरची औषधयोजना

हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रियेनंतर २०-१२-२००४ रोजी मला माझी दीर्घकालीन औषधयोजना सांगण्यात आली. ती खालीलप्रमाणे होती. मला असेही समजले की ही औषधे कमी तर करता येतच नाहीत पण रोगाच्या तीव्रतेनुरूप वाढवतच जातात.

साधारणपणे ऍलोपॅथीमध्ये औषधयोजना, दिवसातून तीनदा घेण्याच्या गोळ्यांच्या स्वरुपात केल्या जाते. औषधे खालीलप्रमाणे लिहून दिली जातात.

अक्र, औषध, मात्रा (मिग्रॅ), औषधप्रकार, उपाययोजना, किंमत*, ३० दिवसांचा खर्च(रु), निर्मिती व कालबाह्यतेच्या तारखा
१, इकोस्प्रिन, १५०, रक्त-तरल-कर, ०-१-०, रु.५.७७/- प्रती १४ गोळ्या, १३, नि:८/०४, का:१०/०५
२, क्लोपिडोग्रेल/ग्रोविन/प्लेग्रिल-७५, रक्त-तरल-कर, ०-१-०, रु.५७.६०/- प्रती १४ गोळ्या, १७३, नि:७/०४, का:६/०६
३, मोनोट्रेट-२०, धमनी विस्फारक, १/२-१/२-०, रु.३३/- प्रती १० गोळ्या, ९९, नि:५/०४, का:४/०५
४, स्टोर्व्हास-१०, मेदविदारक, ०-०-१, रु.८०/- प्रती १० गोळ्या, २४०, नि:७/०४, का:१२/०५
५, ऍम्लोडेपिन-५, क्तदाबशामक, १-०-१, रु.१३.८०/- प्रती १०गोळ्या, ८३, नि:६/०४, का:५/०६
६, लोर्व्हास -२.५, मूत्रल/रक्तदाबशामक, १-०-०, रु.४९.४५/- प्रती १०गोळ्या, १५०, नि:७/०४, का:६/०७

एकूण ३० दिवसांकरताचा खर्च: रू.७५८/- फक्त

*: स्थानिक कर जादा, LTE: Local Taxes Extra
१-१-१: सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर एक एक.
ऍलोपॅथीमधील औषधे बहुधा भरल्या पोटीच घ्यायची असतात.

BD: Bice a day दिवसातून दोनदा, सकाळी नाश्त्यानंतर एक, आणि रात्री जेवणानंतर एक
OD: Once a day , म्हणजे बहुधा रात्री जेवणानंतर एक

वरील माहितीसुद्धा मला मोठ्या कष्टानेच मिळवावी लागली होती. पण त्यामुळे काही नव्या गोष्टी कळल्या होत्या. चक्क डोळेच उघडले होते. पहिले तर हे कळले होते की एकदा हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया झाल्यानंतर, पुन्हा अडथळे होण्याचा धोका टाळण्याकरीता जन्मभर औषधे घ्यावी लागतात. नंतर कळले की ती औषधे रु.७५०/- दरमहा याहूनही महाग असतात. आणि उर्वरित आयुष्यात माणूस लक्षावधी रुपये औषधकंपन्यांना बिनबोभाट देतो. हे औषधांच्या दावणीला बांधलेले आयुष्य आणि हृदयाघाताचा कायमच असणारा धोका यांपासून सोडवणूक करून घेणे हे माझ्या जीवनाचे प्रथम कर्तव्य झाले.

यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच रहात असे. आमच्या रुग्णालयात मला असेही सांगण्यात आले की रक्तदाब जर असाच राहिला तर औषधे (ऍम्लोडेपिन) वाढवावी लागतील. इथे मला ऍलोपॅथीच्या अनुभवासही ‘पुअर बी.पी. मॅनेजमेंट’ म्हणावे की काय असे वाटू लागले.

अनुत्तरित प्रश्नांचा विळखा

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच. कधीच, काहीही वाईट केलेले नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक, गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.

त्यानंतरचे अनेक दिवस मी अक्षरश: निकरानी उपायांचा शोध घेण्यात घालवले. यापुढील कोणतीही ताणचाचणी नकारात्मक यावी आणि उर्वरित आयुष्य औषधविरहित जगता यावे हीच दोन प्रमुख उद्दिष्टे मी ठरवली. ही खरोखरच साध्य आहेत काय, हे माहित नव्हते.

लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवत. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत. उलट ते; फिरायला जात जा (इथे उपजीविकेपाठी बांधलेले मध्यमवर्गीय जीवन वाट्याला आलेले आहे, नाही तर सकाळ-संध्याकाळ, बायकामुलांसकट, कुत्रा हाताशी धरून, बागबगीचे फिरलो असतो), व्यायाम करा (अहो, हे सारे करायला अतिरिक्त बळ कुठून आणू?), प्राणायाम करा (निवांत श्वासोच्छवास करत बसायला, इथे वेळ कुणाला आहे?), दुधीचा रस प्या (दर दिवसाआड आम्ही दुधीचीच तर भाजी खातो की हो. मग तर, मला हृदयविकार व्हायलाच नको), तणाव बाळगू नका (मला काय तणाव बाळगायची हौस आहे?), संतापू नका (लोक संताप आणतात), आराम करा (आणि माझी कामे काय तुम्ही करणार?), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.

माझ्या याआधीच्या दिनचर्येत मला ते साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता, म्हणून तर ही परिस्थिती आलेली होती ना? मग आता मला झालेला आजार, माझी झालेली शस्त्रक्रिया, औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला आहार ह्या साऱ्यांच्या उपस्थितीत मी त्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो, ते मला समजत नव्हते. भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद, नातेवाईक असत. त्यांची माझ्याबाबतची कळकळ खरी होती. हेतू प्रामाणिक असल्याचीही मला खात्री होती. ते सांगत होते त्या उपायांनी, लोक बरेही होत असल्याचे दाखलेही, ते देत असत. माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे, त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे. ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत. निरर्थक वाटत. माझ्या खऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत, असा माझा समज झाला होता.

मला माझ्या उद्दिष्टांकडे नेणारा उपाय दिसेना. मग माझ्या मावसभावाने प्रतिबंधक हृदयोपचारांचा उपाय सुचविला. आयुर्वेदाच्या उपचाराने भ्रमनिरास केला होता. पारंपारिक ऍलोपॅथीक औषधांचा आणि शस्त्रक्रियेचाही म्हणावा तसा उपयोग झालेला नव्हता. तेव्हा निरुपायाने आणि काहीशा अनिच्छेनेच मी प्रतिबंधक हृदयोपचारांकडे वळलो. एरव्हीही, मी अकार्यक्षम झालो तर ज्यांना सांभाळावे लागणार होते त्यांच्या म्हणण्याला मी कसे टाळू शकलो असतो?

प्रतिबंधक हृदयोपचारशाखा

तपास करता असे समजले की हृदयोपचारासाठी ऍलोपॅथीत दोन शाखा आहेत. पारंपारिक शाखा ‘अधिक्षेपक हृदयोपचार’ (इन्व्हेझिव्ह कार्डिओलॉजी) शाखा म्हणून ओळखल्या जाते. वर्धित रक्तदाबावर उपचाराची पारंपारिक पद्धत ह्या शाखेत पुढीलप्रमाणे आहे. १२०/८० पासून वाढत वाढत रक्तदाब १३०/९० च्या पुढे गेल्यावर ते रक्तदाब रक्तदाबशामक गोळ्या देऊन त्याचे व्यवस्थापन करतात. १६०/१०० पेक्षा जास्त झाल्यास रुग्णालयात दाखल करतात. मेदविदारक (कोलेस्टेरॉलनाशक) गोळ्या सुरू करतात. त्यांनीही रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास कार्डिओग्राम, ताणचाचणी, आणि हृदयधमनीआलेखन इत्यादी चाचण्या करवितात. त्यात हृदयधमनीत अडथळे निपजल्यावर हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेद्वारा ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

ह्या शाखेच्या मान्यतेनुसार हृदयविकार प्रगतीशील असतो. तो वयानुसार वाढतच जातो. औषधे व शस्त्रक्रियांच्या आधारे तो केवळ नियंत्रणात ठेवता येतो. नियंत्रणात न राहिल्यास जास्त औषधे व आणखीन शस्त्रक्रिया यांद्वारेच इलाज केल्या जातो. माझी उपाययोजनाही ह्याच वाटेवर वाटचाल करत होती. म्हणून मी ह्या वाटेवर माझ्याआधीच गेलेल्या चारपाच स्नेह्यांना भेटलो. त्यांच्या कहाण्या सविस्तर ऐकल्या. मला अनेक हृदयधमनी रुंदीकरणे व उल्लंघन शस्त्रक्रिया झालेले लोक भेटले. आपण आता पुन्हा कधीच पूर्णत: बरे होणार नाही असे मला वाटू लागले. आपली औषधे कधीच पूर्णपणे सुटणार नाहीत असेही वाटे.

तपास करता ‘प्रतिबंधक हृदयोपचार (प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी)’ शाखा मला माझ्या उद्दिष्टांची पूर्तता करून देऊ शकेल असे वाटू लागले. प्रतिबंधक हृदयोपचारशाखा त्यामानाने नवोदित आहे. ह्या शाखेत औषधे आणि शस्त्रक्रियांविना हृदयविकार माघारी परतवता येतो अशी मान्यता आहे. हे समजताच मला ह्या पोकळ बढाया वाटू लागल्या. मी विचारले की ‘डॉक्टर मला तुम्ही औषधे पूर्णपणे थांबलेली आहेत असा हृदयरुग्ण दाखवू शकाल काय? ज्याला हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेचा उपाय सुचविण्यात आलेला आहे अशा रुग्णास, तुम्ही त्या शस्त्रक्रिया न करता त्याला बरे करू शकता काय? तसे काही बरे झालेले रुग्ण तुम्ही दाखवू शकाल काय’. अनपेक्षितरीत्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली. प्रत्यक्षात तशी काही उदाहरणे पाहिली आणि मग मी प्रतिबंधक हृदयोपचार घेण्याचा निर्णय घेतला.

आणि लौकरात लौकर, म्हणजेच २५ डिसेंबर २००४ रोजी मी 'हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रमात' सामिल झालो. औषधांविना आणि शस्त्रक्रियेविना, केवळ 'जीवनशैली परिवर्तनाद्वारे' हृदयधमनीविकार परत फिरवता येतो आणि माझ्या उद्दिष्टांची पूर्तताही होऊ शकते अशी आशा पल्लवित झाली. २५ मार्च २००५ रोजी तो कार्यक्रम माझ्यापुरता सुफळ संपूर्ण झाला. त्यात सुचविलेली, मी स्वीकारलेली आणि माझ्या दिन:चर्येत बसविलेली जीवनशैली आता मी आयुष्यभर पाळणार होतो.

सम्यक जीवनशैली परिवर्तन

माझ्या प्रकरणाचा अभ्यास करून, माझ्या समस्यांचा नीट विचार करून आणि माझ्या उद्दिष्टांच्या साधनेकरीता मला खालील ‘सम्यक जीवनशैली परिवर्तन’ सुचविण्यात आले.

१. आहार: दररोज जास्तीत जास्त २ चमचे साखर, जास्तीत जास्त २ चमचे तेल/तुप आणि कमीत कमी मीठ असलेला आहार घ्यायचा. सकाळी एक पेला लिंबूपाणी (अर्थातच साखरेविना), काही काळया मनुका अथवा दोन भिजवलेले बदाम, दुधसाखरेविना चहा, सकाळच्या आहारात एक वाटी (मेदविरहित दुधाचे) दही, दोन्ही जेवणांनंतर एक एक तासाने एक एक फळ (केळ, आंबा, सीताफळ, द्राक्षे इत्यादी वगळून, संत्र, मोसंब इत्यादींना प्राधान्य), रात्री झोपतांना एक पेला गाईचे दूध आणि दिवसभरात कमीत कमी आठ पेले पाणी आवश्यक.
२. विहार: सकाळी कमीत कमी ४५ मिनिटे (३-४ किलोमीटर) जलद चालणे
३. शारीरिक लवचिकतेसाठीचे व्यायाम: उपाशीपोटी २० मिनिटे
४. योगासने: उपाशीपोटी २० मिनिटे
५. प्राणायाम: १० मिनिटे
६. ध्यानधारणा/दृश्यकल्पन/कल्पनाचित्रण: १० मिनिटे

सतत तीन महिने कर्मठपणे वरील जीवनशैली अंमलात आणल्यावर माझ्यात आणि माझ्या हृदयधमनीविकारात अनेक परिवर्तने घडून आली. ती अशी:

१. माझे वजन ७० किलोचे ६५ किलो झाले.
२. माझी कंबर ३६ इंचांपासून ३२ इंचांपर्यंत कमी झाली.
३. माझा रक्तदाब १२०/८० राहू लगला.
४. माझ्या रक्तदाबाच्या गोळ्या दरदिवशी दोन (५मिग्रॅ ऍम्लोडेपिन)वरून एकवर आल्या.
५. मी हृदयविकारासंदर्भात भरपूर वाचन करू लागलो.

आणि मला समजून चुकले की हृदयविकार केवळ 'जीवनशैली परिवर्तनाद्वारे' परत फिरवता येतो. मला तर ह्या माहितीचा उपयोग झालाच होता. आता ही माहिती माजी, आजी आणि भावी हृदयविकारग्रस्तांपर्यंत पोहोचविणे अत्यंत जरूर असल्याचे माझ्या मनानी घेतले. म्हणून, मी डॉ.डीन आर्निश यांच्या ‘हृदयविकार माघारी परतविण्याचा कार्यक्रम’ ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे काम वेगाने सुरू केले. १६-०३-२००६ रोजी ते काम सुफळ संपूर्ण झाले.

हृदयस्पंदनदर वाढला होता

१४ जुलै २००५ रोजी पाठपुरावा तपासणी (फॉलोअप चेकअप) साठी आमच्या रुग्णालयात बोलाविले होते. टोकन घेऊन बसल्यानंतर दोन तासांनी माझा नंबर लागला. मला भीती वाटत होती की ह्या वाट बघत थांबण्यामुळे रक्तदाब वाढतो की काय. पण रक्तदाब सामान्य म्हणजे १२०/८० च भरला. मात्र हृदयस्पंदनदर ११० ठोके प्रतिमिनिट भरल्याचे डॉक्टर म्हणाल्या. ह्या निरीक्षणानंतर त्यांनी सकाळची ५ मिलीग्रॅम ऍम्लोडेपिनची गोळी बंद करून त्याऐवजी २५ मिलीग्रॅम ऍटेनोलोलची गोळी सुरू करण्यास सांगितले.

डाव्या खांद्याच्या पाठीमागच्या बाजूला बधीरता येऊ लागली

नंतर काही दिवसांनी, खांद्यांच्या पाठीकडल्या भागात मुंग्या आल्यासारखा बधीरपणा जाणवत असे. डॉक्टरांनी तो अस्थिजन्य (ऑर्थोपेडिक) स्वरूपाचा असावा, असे सांगून त्यावर बी. जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या. ह्या गोळ्यांमुळे तसली बधीरता हळूहळू कमी होत गेली. साधारणत: तीन चार महिन्यांनंतर त्या गोळ्याही बंद केल्या. मात्र, नंतर पुन्हा तसली बधीरता कधीही जाणवली नाही.

रक्तदाब कमी होऊ लागला

२८ सप्टेंबर २००५ रोजी सकाळी ९०० वाजता नियमित तपासणी निर्धारित होती. त्यावेळी डॉक्टरांना रक्तदाब ९४/७० व नाडी ७० ठोके प्रतिमिनिट चालतांना सापडली. त्यापूर्वीही दोनदा तपासणी करीत असतांना रक्तदाब कमी सापडला होता. २२-०८-२००५ रोजी सकाळी ११०० वाजता तो १००/७० तर २६-०८-२००५ रोजी सकाळी ९०० वाजता तो ११०/७० असा मोजल्या गेला होता. त्यावर त्यांनी कधी चक्कर येते का? डोळ्यांपुढे अंधेरी येते का? अशी विचारणा केली. गेल्या काही दिवसांपासून मला खरोखरीच झोपून उठल्यावर डोळ्यांपुढे क्षणभरच का होईना अंधेरी येत असे, तोल गेल्यासारखे वाटत असे. पण क्षणभरच. ते मी त्यांना सांगितले. ते म्हणाले की ही चांगली लक्षणे आहेत. मला आता रक्तदाब कमी ठेवण्यासाठी जास्तीची औषधे घेण्याची गरज राहिलेली नाही. आणि त्यांनी ऍम्लोडेपिनची ५ मिलीग्रॅमची गोळी बंद करून त्याऐवजी ऍम्लोडेपिनची २.५ मिलीग्रॅमची गोळी सुरू केली. आतापर्यंत मी १० मिग्रँ स्टोर्वासची मेदविदारक गोळी रोज नियमित घेत असे. ती कमी करता येईल का? किंवा बंद करता येईल का असे मी डॉक्टरांना विचारले. हे शक्य आहे का ते पाहण्यासाठी रक्ताची लिपीड-रूपरेषा करवून घ्यावी असा त्यांनी सल्ला दिला.

ट्रायग्लिसेराईडस वाढली

ही रक्ततपासणी ०८-११-२००५ रोजी करण्यात आली. एकूण कोलेस्टेरॉल १६५, उच्च्च सघन कोलेस्टेरॉल ३५, कमी सघन कोलेस्टेरॉल ९२ आणि ट्रायग्लिसेराईडस १९२ असा निकाल लागला. एकूण कोलेस्टेरॉल १३० पेक्षा कमी नसल्याने मेदविदारक गोळी कमी न करता तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ट्रायग्लिसेराईडस १९२ म्हणजे खूपच जास्त होती. मग शोध घेतल्यावर मला असे कळले की गोड खूप खाल्याने ती वाढतात. आणि रक्ततपासणीच्या आधी नुकतीच दिवाळी झालेली होती. म्हणून पथ्यावर अपथ्यकर परिणाम झालेलाच होता. त्यामुळे एरव्ही कमी राहत असलेली ट्रायग्लिसेराईडस नेमकी रक्ततपासणीच्या वेळीच वाढलेली असावित असा मी निष्कर्ष काढला.

पुन्हा रक्तदाब कमी होऊ लागला

माझा रक्तदाब तर नियंत्रणात राहत होता, १२०/८० पेक्षाही कमीच राहत होता. २८-०९-२००५ रोजी जेव्हा ९०/७० असा रक्तदाब मोजण्यात आला तेव्हा ५ मिग्र ऍम्लोडेपीन ची सुरू असलेली गोळी अर्धीच सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होतेच. नंतरही सातत्याने रक्तदाब कमीच राहत असल्याने १३-१२-२००५ रोजी २.५ मिग्र लोर्वास ची जी गोळी मी रक्तदाबशमनार्थ घेत होतो ती अर्धी बंद करण्यात आली. आणि मग ०९-०१-२००६ रोजी ती पूर्णपणे बंद करण्यात आली. मेदविदारक गोळी कमी करण्याचे दृष्टीने, १०-०२-२००६ रोजी पुन्हा रक्ततपासणी करण्यात आली तेव्हा एकूण कोलेस्टेरॉल १४० व ट्रायग्लिसेराईडस ९३ असा निकाल लागला. मग १० मिग्र स्टोर्वासची गोळी अर्धी बंद करण्यात आली.

इतर जीवनशैलीगत परिवर्तनांसाठी (म्हणजे चालणे, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, योगसाधना इत्यादी) मी केवळ तास दीड तासच काय तो वेगळ्याने देत असे. पण माझ्या दिनचर्येत मी आमुलाग्र बदल घडवला होता. कार्यालयीन वेळात मी दूरवर चालण्याची कामे स्वत:वर ओढवून घेऊ लागलो. जातायेता चारचार मजले उद्-वाहकाऐवजी जिन्याचाच वापर करू लागलो. सतत संगणकावर बसावे लागे तेव्हा, दर तासातासाने मी उठून उभा राहत असे. आळोखे पिळोखे देत असे. जमल्यास सहकारी मित्रांच्या खोल्यांपर्यंत जावून त्यांच्याशी चार शब्द बोलूनही येत असे. याशिवाय आहारावरील नियंत्रण यथासांग सांभाळण्यात मला माझ्या पत्नीची अत्यंत मोलाची मदत झाली.

या सार्‍यांचा एकत्रित परिणाम म्हणून माझा रक्तदाब कायम १२०/८० पेक्षाही कमीच राहू लागला. त्यामुळे २६-०६-२००६ रोजी २५ मिग्र ऍटेनोलोल गोळीही कमी करून अर्धीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मेदविदारक गोळी कमी करण्याचे दृष्टीने, १०-०२-२००६ रोजी पुन्हा रक्ततपासणी करण्यात आली तेव्हा एकूण कोलेस्टेरॉल १४० व ट्रायग्लिसेराईडस ९३ असा निकाल लागला. मग १० मिग्र स्टोर्वासची गोळी अर्धी बंद करण्यात आली.

पुन्हा रक्त व मूत्र तपासणी केली

२२-०६-२००६ रोजी माझी रक्त व मूत्र तपासणी पुन्हा करण्यात आली. रक्तशर्करा उपाशीपोटी ८० तर जेवल्यावर दोन तासांनी ८९ भरली. त्यामुळे मधुमेह नाही आणि रक्तशर्करा उत्तम स्थितीत आहे हे स्पष्ट झाले. रक्तातील कोलेस्टेरॉल १५३ व ट्रायग्लिसेराईडस् १०३ आढळले. हे त्यांच्यावर व्यवस्थित नियंत्रण असल्याचे निदर्शक होते. मूत्रतपासणीवरून मूत्रपिंडांवर कसलाच विपरित परिणाम झाल्याचे दिसले नाही. रक्तदाबही पूर्णपणे नियंत्रणात होता. कमीच होता. म्हणून ह्या तपासणीनंतर रक्तदाबाच्या गोळीची मात्रा घटविण्यात आली. नंतर २२-०९-२००६ रोजी रक्त पातळ करणार्‍या अस्पिरीनचे प्रमाणही घटवून अर्धे (७५ मिग्र) करण्यात आले. हल्ली माझा रक्तदाब खालीलप्रमाणे मोजण्यात आलेला आहे.

दिनांक, रक्तदाव (मिमी पारा)
१९-०७-२००६, ११०/८०
२८-०७-२००६, ११२/७६

०७-१२-२००४ रोजी हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर
दोन वर्षांमध्ये औषधयोजनेत साधता आलेली घट

अक्र, औषधयोजना, मात्रा (मिग्रॅ), औषधप्रकार, मूळ उपाय, सध्याची उपाययोजना, शेवटल्या बदलाच्या तारखा, अभिप्राय

१, इकोस्प्रिन-१५०, रक्त-तरल-कर, ०-१-०, ०-१/२-०, २२-०९-२००६, ५० टक्के सुधारणा झाली
२, क्लोपिडोग्रेल/ग्रोविन/प्लेग्रिल-७५, रक्त-तरल-कर, ०-१-०, ०-०-०, ०७-१२-२००५, १०० टक्के सुधारणा झाली
३, मोनोट्रेट-२०, धमनी विस्फारक, १/२-१/२-०, ०-०-० , १६-०८-२००५, १०० टक्के सुधारणा झाली
४, स्टोर्व्हास-१०, मेदविदारक, ०-०-१, ०-०-०, २६-०६-२००६, १०० टक्के सुधारणा झाली
५, ऍम्लोडेपिन-५, रक्तदाबशामक, १-०-१, १/२-०-०, २६-०६-२००६, खूपच सुधारणा झाली
६, लोर्व्हास-२.५, मूत्रल/रक्तदाबशामक, १-०-०, ०-०-०, ०९-०१-२००६, १०० टक्के सुधारणा झाली

आंतरिक शक्तीचा शोध

शरीर व्याधीग्रस्त कसे झाले? ते पूर्वपदावर आणण्याचा उपाय काय? आपल्या शरीरात ईश्वराने किती अद्-भूत स्वसुधारशक्ती भरलेली आहे? आणि तिचा साक्षात्कार आपल्याला कसा करून घेता येईल? ह्याच गोष्टींचा, ह्या दोन वर्षांच्या काळात मी निरंतर ध्यास घेतला होता. शरीरात खूपच स्वसुधारशक्ती असल्याचे मला कळून आले. ती शक्ती जागृत करण्यात मी बव्हंशी यशस्वी झालो. ही शोधकथा वाचून तसल्याच दुविधेत पडलेल्यांना निश्चितच लाभ होऊ शकेल, या हेतूनेच ती शब्दबद्ध केलेली आहे.
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: